कोकणातील निसर्ग नवल
उन्हाळी सुटी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच; पण येथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून हा अनुभव घ्यायला हरकत नाही. निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. पण फळांचा राजा आंबा, तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी ही फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणला आहे. या सर्व निसर्गाच्या समृद्धीसोबतच अनेक निसर्गनवल कोकणात जागोजागी विखुरलेली पाहायला मिळतात. आपण कोकणात सडय़ावर कोरलेली मानवनिर्मित कातळशिल्पे यापूर्वी पाहिली आहेतच. त्याचसोबत अनेक निसर्गनिर्मित नवलस्थाने कोकणात आहेत. ती प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिली पाहिजेत. संगनातेश्वरचा सिंहनाद : मुंबई – गोवा महामार्गावर लांजा आणि राजापूरच्यामध्ये ओणी नावाचे गाव आहे. इथून एक रस्ता पाचलमार्गे अणुस्कुरा घाटाकडे जातो. याच पाचल गावापाशी अर्जुना नदीच्या तीरावर संगनातेश्वराचे प्राचीन मंदिर उभे आ...