कोकणातील गणेशोत्सव
कोकणात पावसाळी हंगामात चोहीकडे हिरवाई असते. भातशेतीने सर्वत्र वातावरणात एक वेगळीच नजाकत आलेली असते. श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणूनच त्याचा आनंद घेतला जातो
श्रावण सरल्यावर येणा-या भाद्रपद
महिन्यातच कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. ऋण
काढून सण साजरा करण्याचे कोकणातील माणसांचे स्वभावगुण वैशिष्टय़ आहे.
पंचवीस- तीस वर्षापूर्वी आजच्या इतकी दळणवळणाची साधने प्रगत झाली नव्हती.
कोकणातील नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईत असणा-यांना एस.टी.च्या गाडयांनीच
प्रवास करावा लागे.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळेही आजच्या
इतके विणले गेले नव्हते. अनेक गावातून रस्ता, पूल नसल्याने होडीनेच आणि
ओहोळावरच्या साकवावरून कसरत करावी लागत पायवाटेने गावातलं घर गाठावे लागे.
तीस वर्षापूर्वी अवघे कोकण मुंबईत नोकरी-व्यवसायात असणा-या प्रत्येक घरातील
एखाद्याच्या येणा-या मनीऑर्डरवरच सारे कुटुंब अवलंबून होते. मातीच्या
नळ्याची आणि कौलारू असणारी घरं, मातीच्या भिंती त्या देखील सिमेंटच्या
प्लास्टरलाही मागे काढतील इतक्या सुबक होत्या.
गावोगावच्या घराकडे जाण्यासाठी पायवाट
होती. रस्तेही नव्हते. पण तीस-चाळीस वर्षापूर्वीही फार आर्थिक स्थिती
नसतानाही कोकणातील प्रत्येक घरात मात्र गणेशाचे उत्साही आगमन, त्याचे दीड,
पाच, सात, अकरा, दिवस विधीवत पूजन आणि जड अंत:करणाने ‘गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी गावातील, वाडीतील सार्वजनिक पाणवठयावर
केले जाणारे विसर्जन हे सारे दरवर्षी त्याच उत्साहात, दिमाखात ठाणेपासून
बांद्यापर्यंत अखंड कोकण प्रांतात सण साजरा केला जातो.
त्याकाळी मुंबईतील नोकरी, व्यवसायातील
मुंबईकर ग्रामविकास मंडळांच्या मार्फत एकत्र येऊन एस.टी. गाडया बुकिंग करून
वाडीत घेऊन येत. कुटुंबातील मुलगा, वडील, मुंबईतून गावाकडे येणार म्हणून
रात्री-अपरात्री कंदील घेऊन त्या येणा-या मुंबईकरांची वाट पाहणारे
रात्र-रात्र जागवून काढणारे गाववाले एस.टी.च्या थांब्यांवर किंवा प्रमुख
तिठयांवर रात्र जागवायचे. परंतु त्यातही आत्मीयता होती. प्रेम होते.
आपल्या मुंबईकराच्या येणाची प्रतीक्षा
होती. टेलिफोन, मोबाईलचा तर थांगपत्ताही नव्हता. गावात चार-दोन टेलिफोन
होते. यामुळे संपर्काचे आणि संवादाचे आजच्या इतके प्रगत माध्यम नव्हते;
परंतु वाट पाहण्यातही अंतर्मनातील आपुलकी आणि प्रेम मात्र ओतप्रोत होते.
मागील काही वर्षात शहरीकरणाचा परिणाम
कोकणातील घरांवर आणि माणसांवरही दिसू लागला आहे. वाडीतून सिमेंटचे अनेक
टुमदार बंगले उभे झाले आहेत. कोकणातील झुडप भातशेतीची हिरवळ तशीच आहे.
परंतु दळणवळणाची साधने वाढली.आजच्या बदलत्या स्थित्यंतरातही २२०० एस.टी.
गाडया मुंबईकरांना घेऊन कोकणात येत आहेत. तर कोकण रेल्वेमार्गावर मुंबईतून
कोकणात येणा-या अनेक जादा रेल्वे गाडया सोडण्यात आल्या आहेत.
याखेरीज गावातील मुंबईस्थित आणि गावामध्ये
राहणा-या अनेक कु टुंबांमध्ये चारचाकी गाडया दारात उभ्या असलेल्या दिसतात.
तर अनेक जण मुंबईतून गावी खास गाडया भाडयाने घेऊन येतात आणि पाच दिवस, सात
दिवस पूर्वीच्याच उत्साहाने गणपतीचा हा उत्सव आनंदी वातावरणात साजरा होतो.
संगणकीय युगातही कोकणातील हा गणपती उत्सव कु टुंबातील काही नोकरी
व्यवसायानिमित्त दूरवर राहणा-यांना एकत्र आणतो.
सर्वसामान्य शेतक-यापासून श्रीमंतीपर्यंत
सर्वच जण श्रीगणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा करून असतात. कितीही पाऊस असला,
महागाई गगनाला भिडली तरीही कोकणातील माणूस गणपतीचा हा उत्सव थाटामाटातच
साजरा करतो.
प्रत्येक घरात, कु टुंबात गणेशमूर्तीचे
होणारे पूजन बदलत्या काळातही पूर्वीच्याच भक्तिभावाने केले जाते. म्हणूनच
गणेशोत्सवात मुंबईकर अत्यंत आपुलकीने, मायेने आणि गावच्या घराच्या ओढीने
अनेक अडचणींवर मात करीत धाव घेतात आणि आनंदाने, उत्साहाने उत्सव साजरा
करतात.
Comments
Post a Comment