गुरू का करावा
आजपर्यंत आपण आयुष्यात सगळ्या गोष्टी कोणा ना कोणाकडून शिकत आलेले असतो. प्रत्येक वयात आपला आदर्श बदलत असतो, आपला आयुष्याचा दृष्टिकोन बदलत असतो, आपल्या आवडी निवडी बदलत असतात तसेच आपले शिक्षक सुद्धा बदलत असतात.
काही जण गुरू आणि शिक्षक ह्यात खूप गल्लत करतात. शिक्षक हा ठराविक वेळी ठराविक विषयाचं मार्गदर्शन करत असतो परंतु गुरू तुम्हाला पुस्तका बाहेरचं जग दाखवून त्यामध्ये जगायला शिकवत असतात. शिक्षक शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी पर्यंत सोबत असतात पण गुरू तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असतात.
गुरू तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांमध्ये जगण्याचे कौशल्य शिकवत असतात. आयुष्यात योग्य दिशेने चालायचे शिक्षण देतात. ते मार्ग दाखवतात आपण विश्वास ठेऊन पुढे जायचं असतं. गुरूकृपेने आणि मार्गदर्शनामुळे आपल्याला हवं असलेलं आयुष्यात मिळवू शकतो. गुरू प्रत्येक दुःखात पाठीशी उभे असतात मात्र त्यासाठी आपल्याकडे ती बघायची दृष्टी लागते.
आजकाल लोकं गुरूंवर सुद्धा टिका टिपन्नी करतात. कारण ह्यांना 100 टक्के प्रत्येक गोष्टीची खात्री हमी लागते. गुरू केला की लगेच गुरूंनी माझा म्हणणं, गाऱ्हाणं ऐकायलाच पाहिजे. मी गुरूंना एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती झालीच पाहिजे ते सुद्धा लगेच. मात्र कुणीही आत्मचिंतन करून स्वत:ला हा प्रश्न विचारत नाही की, स्वत:च्या चुका, अपराध भोग भोगल्याशिवाय गुरूंनी आपल्याला लगेच का एखादी गोष्ट द्यावी? कोणत्याही कष्ट शिवाय गुरूंनी तुम्हाला आयते का द्यावे? हल्ली अनेकांची मानसिकता खूप वेगळ झालेली आहे, अनेक जण गुरूंनाच उलट प्रश्न करतात की, तुमची ताकद आहे म्हणून तुम्हाला माझे गुरू केलेय आहे ना? मग माझा हे काम झालाच पाहिजे. मात्र लोकं हे विसरतात की, गुरू मिळायला परमभाग्य लाभते. काहींना गुरू भाग्योदयाने लौकर मिळाले की, कोणतेही प्रायश्चित न करता. पाप पुण्याचा विचार न करता गुरूंनाच तुम्ही उलट प्रश्न करणे हे योग्य आहे का? गुरू केला म्हणजे लगेच सुख समृद्धी मिळणार, सगळी कामे मार्गी लागणार ह्या भ्रमात कधीच कोणी राहू नका. गुरू फक्त तुमच्या जीवनाला योग्य दिशा देतात, तुमच्या पाप पुण्याच्या पात्रतेनुसार तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. पण गुरूंनी सांगीतलेल्या वाटेवर चालणे न चालणे हे प्रत्येकाचे कर्म आहे. गुरू म्हणजे भगवंत आणि मनुष्य ह्यामधील एक मजबूत दुवा आहे. गुरू मार्ग दाखवतात त्या वाटेवर न चालता स्वत:च्याच अहंभावात जगलो तर गुरू तरी तुमच्यासाठी का काही करतील? ह्याचाही लोकांनी विचार करणे खूप गरजेचे आहे. ह्यासाठी आत्मचिंतनाची प्रत्येकाने सवय लावायला हवी.
आपण हे विसरतो की, गुरू मार्ग दाखवतो, त्या रस्त्यावर चालायला सोबत करतो, अडथळा आहे हे पण सांगतो पण आपल्या पायात तेवढी ताकद आणि मनात निष्ठा आणि विश्वास हवा तर तो रस्ता तुम्ही पार करू शकता.
गुरूंवर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट आयुष्यात साध्य करू शकाल पण त्याला तुमची तेवढी निष्ठा हवी. गुरू केला म्हणजे मी बुलेटप्रुफ जॅकेट घालून तयार आहे माझे कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा अहंभावात जगायचे नसते. तुमची तुमच्या गुरूंचरणी तेवढी अढळ श्रद्धा हवी, कष्ट घ्यायची तयारी हवी तर गुरूंनी दिलेला मंत्र बुलेटप्रुफ जॅकेटचे काम करेल आणि तुमचा जीव वाचेल.
गुरू आयुष्य जगायला शिकवणारे वाटाड्या आहेत, गुरू दुःखात प्रेमाची सावली आहे, गुरू आयुष्यात अमूल्य असणारे असे रसायन आहे ज्यामुळे मोक्ष मिळतो. गुरू परमेश्वर आणि माणूस ह्यांच्यातला दुवा आहे जो तुम्हाला परमात्म्याशी जोडतो, गुरू तुमचा आयुष्याची ढाल आहे. गुरू आहे तर आयुष्य सुखी होते.
आयुष्यात एक गुरू नक्की करावा म्हणजे प्रपंचातून परमार्थ साधता येतो आणि मोक्षाचा प्रवास सुखमय करता येतो.
Comments
Post a Comment