डिजिटल दुनियेत हरवत चाललेली माणुसकी…
पूर्वीची ती शांत संध्याकाळ… मोकळ्या अंगणात झालेल्या मनमोकळ्या गप्पा, सोबतीत घेतलेला गरम चहा हे सगळं आज “ Notification,”च्या गर्दीत कुठेतरी हरवलंय. इंटरनेटच्या या झगमगत्या दुनियेत, माणसं एकमेकांशी बोलणं विसरत चालली आहेत. संवाद आहे खरा – पण तो फक्त फोनवर, स्टोरीमध्ये आणि स्टेटसमध्ये! समोरासमोर बसून, डोळ्यांत पाहून बोलायचं थांबलंय… पूर्वी नजरेत संवाद असायचा, आज तो फक्त नेटवर्कवर आहे. आज कळेनासं झालंय की आपण फोन हाताळतोय की फोनच आपल्याला? लोक प्रेम स्टेटसवर दाखवतात, काळजी स्टोरीत व्यक्त करतात, आणि साथ फक्त Reels मध्येच दिसते. Nice, Love it, So sweet अशा कमेंट्स केल्या की खरंच प्रेम व्यक्त होतं का? की हे सगळं फक्त स्क्रीनपुरतं नातं आहे? मनात काय चाललंय, हे समजायला आज लाईक्स आणि इमोजीच पुरेसे मानले जातात… पण विचारपूस,आणि डोळ्यांतली ती जिव्हाळ्याची भावना – ती आता कुठे आहे? बहुतेक तीही नेटवर्कच्या सिग्नलमध्ये हरवून गेली आहे… आपण ऑनलाईन नाती निर्माण करतोय, पण खरा प्रश्न असा आहे ही नाती आपल्या अडचणीच्या क्षणी आपल्यासाठी उभी राहतील का? आपल्या सुख-दुःखात खऱ्या अर्थानं सहभागी होतील का? ...